तालुका प्रतिनिधी/ दारव्हा दारव्हा पंचायत समिती सध्या प्रभारी राजच्या विळख्यात सापडली असून, सर्वच प्रमुख विभागांचा कारभार कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. स्वतः गटविकास अधिकारी पदासह गटशिक्षणाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी आणि मनरेगा यांसारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने संपूर्ण प्रशासकीय कामकाज ढेपाळले आहे. प्रभारी गटविकास अधिकारी कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध दाखल्यांसाठी महिनोन्महिने कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारंवार तक्रारी करून आणि वृत्तपत्रांमधून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध होऊनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तालुक्यात तीव्र असंतोष पसरला आहे. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहून ठेकेदार व राजकीय पुढारी धार्जिण वृत्ती च्या या मुजोर आणि सुस्त प्रशासनाविरोधात दारव्हा तालुक्यातील नागरिकांनी राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही मार्गाने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी २२ मे रोजी सकाळी ११.३० वाजता प्रेस क्लबच्या कार्यालयापासून ते तहसीलदार यांना निवेदन देत पंचायत समिती कार्यालयावर ‘अर्धनग्न भंडारा आंदोलन’ छेडण्यात आले आहे. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नसून जनतेच्या हक्कासाठी पुकारण्यात आल्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांनी आपल्या प्रलंबित तक्रारींसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलकाच्या वतीने करण्यात आले आहे.