हिंगणघाट :- येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हिंगणघाट ग्रामीण व शहर प्रखडाच्या वतीने नियमितपणे मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान जाणूनबुजून केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री साहेब यांना हिंगणघाट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ देत गोवंश संरक्षणाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोवंश हा भारतीय शेती, पर्यावरण, संस्कृती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याचे संरक्षण करणे ही राज्य व प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील अवैध गोवंश हत्या ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत प्रशासनाने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. पालकमंत्री वर्धा जिल्हा, मा. जिल्हाधिकारी वर्धा, मा. पोलीस अधीक्षक वर्धा, मा. आमदार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र तसेच मा. ठाणेदार हिंगणघाट यांना देण्यात आल्या आहेत.
या वेळी निवेदन देतांना वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये,वर्धा जिल्हा विहिप सह सेवा प्रमुख ओमप्रकाश मस्कर, वर्धा जिल्हा बजरंग दल सह गौरक्षा प्रमुख राम नक्के, विहिप हिंगणघाट प्रखंड मंत्री देवा वाघमारे, सहमंत्री अतुल सूर,हिंगणघाट नगर विहिप अध्यक्ष पंकज देशपांडे, हिंगणघाट शहर विहिप मंत्री राम पोतदार, सहमंत्री नरेंद्र गंधारे,प्रखंड सेवा प्रमुख संजय कडू, सुरज वरठी, धर्मा जोशी, बजरंग दल हिंगणघाट नगर संयोजक संदीप नासरे, विहिप पदाधिकारी व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




